दिल्लीतील निर्भया प्रकरण, कर्जत मधील भयानक अत्याचाराची घटना आणि आता हैद्राबादमध्ये घडलेले पुनः निर्भय प्रकरणाने संपूर्ण देश अस्वस्थ झाला आहे. संपूर्ण देश संताप व्यक्त करत आहे. देशात पुन्हा एकदा मुलींच्या ,महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर पडला आहे. हैद्राबादमध्ये डॉ प्रियांका रेड्डी या २६ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची जाळून अत्यंत क्रूरतेने हत्या करण्यात आली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या निचतंम कृत्य करणाऱ्या हैवानांविरोधात देशातून तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहेत. देशात अशा घटना घडतात तरी कशा, काय सुरू आहे देशात, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या प्रा. जान्हवी साल्पेकर यांनी केला आहे.
जेव्हा – जेव्हा अशा घटना देशात घडल्या तेव्हा-तेव्हा शासनाने कठोर पावले उचलली. मात्र पुन्हा अशा घटना का घडतात, पुन्हा पुन्हा मुलींचा बळी का जातोय, पुन्हा पुन्हा निर्भया का घडतंय, याबाबत शासनाने गंभीरपणे विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा विकृतीला रोखण्यासाठी अत्यंत कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, असे सांगत अशांना भर चौकात नग्न करून पेटवून द्यावे, असा संताप देखील त्यांनी व्यक्त केला.





