Press "Enter" to skip to content

कोकणाच्या विकासासाठी कटिबद्ध – पंतप्रधान नरेंद मोदी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : दिल्लीत आपण नरेंद्रला पुन्हा बसवले त्याचप्रमाणे देवेंद्रलाही महाराष्ट्रात पुन्हा सत्ता द्या, असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून कोकणाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आज (बुधवार, दि. १६ )खारघर येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत दिली
पनवेलचे विधानसभेचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, डोंबिवलीचे उमेदवार पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पेणचे उमेदवार रवीशेठ पाटील, ऐरोलीचे उमेदवार गणेश नाईक, बेलापूरच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांची अफाट गर्दी पाहून मला तुमचा उत्साह दिसतोय तो अभूतपूर्व आहे, एवढी मोठी सभा दुपारी होत नसते पण हि सभा रखरखत्या उन्हातही उत्सवाप्रमाणे आणि भव्यदिव्य असल्याची पोचपावती त्यांनी देत या सभेचे कौतुक केले आणि या सभेतून जुने रेकार्ड मोडण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी व्यासपीठावर उमेदवारांसह केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, आमदार निरंजन डावखरे, माथाडींचे नेते नरेंद्र पाटील, कोकण प्रांत संघटक सतीश धोंड, महापौर डॉ. कविता चौतमोल उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, दिल्लीत आपण नरेंद्रला पुन्हा बसवले आता त्याच ताकदीने महाराष्ट्रात देवेंद्रला देखील पुन्हा बसवा. दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र. हा नरेंद्र, देवेंद्रचा फॉर्म्युला गेल्या पाच वर्षात सुपरहिट राहिला आहे. आपण हे पण लक्षात ठेवा जेव्हा नरेंद्र आणि देवेंद्र सोबत उभे राहतात तेव्हा ते एक अधिक एक दोन होत नाहीत तर एकावर एक अकरा होतात. येणाऱ्या वर्षात हा फॉर्म्युला महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचवणार आहे. २०१४ पूर्वी मुंबई आणि परिसरात रिअल इस्टेट क्षेत्रात अंडरवर्ल्ड आणि बिल्डर माफियांचे संबंध होते, अनेक गोष्टी त्यावेळी घडल्या. त्याचे पडलेले डाग काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आजवर धुऊन काढता आलेले नाहीत.शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणाऱ्या आणि गरीबांच्या घराची स्वप्ने उद्ध्वस्त करणाऱ्या लँड माफियांना संपवण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षात झाला. पूर्वी नेत्यांच्या संगनमतातून बिल्डर माफियांची मनमर्जी चालायची. रिअल इस्टेट हे क्षेत्र भ्रष्टाचाराच पैसा खपवण्याचे माध्यम बनले होते, अशा शब्दांत मोदींनी यावेळी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी बोलताना या परिसरात तब्बल दोन लाख घरे उपलब्ध होणार असल्याचे सांगून हा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. विविध सुविधा आणि प्रकल्पांच्या माध्यमातून हा परिसर रोजगाराचे महत्वपूर्ण केंद्र होणार आहे. व कोकणाचा हा परिसर नवीन भारताचा आर्थिक केंद्रबिंदू असणार आहे आणि त्यासाठी सर्वोत्तपरी ताकद देणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गतिमान पध्दतीने काम करण्यात शासनाला यश आल्याचे सांगितले. विविध लोककल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद करून पंतप्रधान आवास योजनेखाली दोन लाख घरे पूर्णत्वास येत आहेत त्याचबरोबर पनवेलच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोंढाणे धरण सिडकोच्या माध्यमातून पूर्ण करण्यास मंजूरी दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहोरात्र देशाच्या विकासासाठी मेहनत घेतली असल्याचे नमूद करून त्यांच्या कार्यामुळे आपला देश आणि राज्य प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.

कोकण दर्पण .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »