नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धानी जगाला शांतीचा मार्ग दिला, जगाला मानवतेचा संदेश दिला , असे प्रतिपादन बेलापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस , शेतकरी कामगार पक्ष आणि मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांनी नेरुळ येथे केले. धम्मचक्र प्रवर्तन आणि अशोका विजयादशमी निमित्त आज अशोक गावडे यांनी नेरुळ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनाला भेट दिली आणि सर्व नागरिकांना तसेच अनुयायांना शुभेच्छा दिल्या.
यानिमित्ताने सम्यक फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धम्मचक्र प्रवर्तन आणि अशोका विजयादशमी कार्यक्रमात अशोक गावडे यांचे आयोजकांनी जोरदार स्वागत केले आणि बेलापूरच्या लढाईसाठी शुभेच्छा दिल्या. अशोक गावडे यांनी देखील सर्व अनुयायांना शुभेच्छा दिल्या. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक हे राजांचे राजा होते. त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचारप्रसार संपूर्ण जगात केला. मानवतेच्या कल्याणाचा बुद्धांचा हाच मार्ग डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला. बाबासाहेबांचे देशावर आणि समाजावर अनंत उपकार आहेत , असे प्रतिपादन अशोक गावडे यांनी केले.
कोकण दर्पण.





