गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
नवी मुंबई, प्रतिनिधी : मुंबई – गोवा हायवेवर बायपास नाही, अपूर्ण ब्रीजेस आणि निकृष्ट रस्ते सहन करून कोकणात टोल भरून जा आणि सरकारच्या भरभराटीस आर्थिक हातभार लावा अशी अघोषित भूमिका राज्य शासनाने घेतल्याचे चित्र दिसत आहे. कोकणवासियांनी मात्र शासनाच्या अशा भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रतिवर्षी कोकणातील चाकरमानी हा गणेशोत्सवा निमित्ताने आपआपल्या मुळगावी सहपरिवार जात असतो. यानिमित्ताने सरकारच्या माध्यमातून कोकणस्थ जनतेला मुंबई – बंगळूरू व मुंबई – गोवा या महामार्गांवर जाणे – येणे च्या प्रवासासाठी सवलत म्हणून टोलमाफी दिली जाते. मुंबईसह संपूर्ण MMRDA क्षेत्रातील निवासी भागातील वाहतूक पोलीस शाखेच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रे सादर करून नागरिक दरवर्षी टोलमाफीचा पास घेत असतो.
नागरिक आपल्या विभागातील वाहतूक पोलीस शाखेच्या कार्यालयात जाऊन विचारपूस करीत आहेत. मात्र यंदा सरकारचा नूर काही औरच असल्याचे भासत असून, गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपलेला असताना आणि मुंबईकर चाकरमानी कोकणात निघालेला असल्याची माहिती असून देखील शासनाने कोकणवासियांना बेदखल केल्यात जमा असल्याचे चित्र आहे अशी संतप्त प्रतिक्रिया कोकण रहिवासी संघाचे नवी मुंबई अध्यक्ष शैलेश शंकर घाग यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई – गोवा महामार्गावरील बाजारपेठा व गर्दीच्या शहराबाहेरून न झालेले बायपास, मुख्य शहरातील अपूर्ण पूल तसेच सिमेंट काँक्रीटचे असमांतर व भेगांनी दुभंगलेले रस्ते अश्या द्रविडी प्राणायामातून टोल भरूनच पुन्हा एकदा गणपतीसाठी गावी जाण्याचे नशिबी आल्याने प्रवाश्यांमध्ये असंतोषाची भावना आहे असे उदविग्न मत देखील शैलेश घाग यांनी मांडले आहे.






Be First to Comment