नवी मुंबई : कोकणातील पुरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मदतीचा हात पुढे केला आहे. नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या पुढाकाराने अन्न-धान्य व जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले तीन ट्रक सामान कोकणातील महाड व चिपळूण तालुक्यात रवाना करण्यात आले. आज तीन ट्रकद्वारे ६० टन सामान पाठविण्यात आले. नवी मुंबई राष्ट्रवादीच्या वतीने काल आठ ट्रकमधून ८० टन सामान पाठविण्यात आले होते.
२०१९ सालाप्रमाणे यंदाही अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन महाराष्ट्रात जलमय परिस्थिती उद्भवली आहे. शेकडो लोकं मृत्युमूखी पडले आहेत. हजारो परिवारांचे संसार उघड्यावर आले आहेत. अशा प्रकारचे फार मोठं गंभीर संकट आज महाराष्ट्रासमोर उभे ठाकलेलं आहे. अशा कठीण प्रसंगी एक भारतीय म्हणुन आपली स्वतःची जवाबदारी पार पाडण्याची ही वेळ आलेली आहे, अश्याच प्रामाणिक उद्देशाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार आम्ही माणुसकीचा धर्म जोपासत आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रशांत पाटील, नगरसेविका स्वप्नाताई गायकवाड तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






