नवी मुंबई : मराठा आरक्षण लढयाच्या समर्थनात मराठा आक्रोश मार्चाच्या वतीने रविवार १८ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता एरोली ते माथाडी भवन, वाशी नवीमुंबई पर्यंत बाईक रॅलीचे आयोजन केले असून, मराठा आरक्षण लढ्याच्या समर्थनात सोलापूरच्या आक्रोश मोर्चा नंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नवीमुंबईत निघणा-या या बाईक रॅलीमध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी आज वाशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
सोलापूर याठिकाणी ४ जुलै रोजी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला माथाडी युनियन, माथाडी पतपेढी, माथाडी ग्राहक सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते, सोलापूर येथील मोर्चा पाहून प्रेरित होऊन उत्स्फुर्तपणे या बाईक रॅलीत सर्व कर्मचारी, माथाडी कामगार, मराठा आक्रोश मोर्चाचे कार्यकर्ते व मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारे विविध जातीधर्माचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
ही बाईक रैली ऐरोली सेक्टर-१६ च्या गार्डनमधील स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून निघणार असून, सेक्टर-१६ पासून ती पुढील मार्गाने जाणार आहे. मुलुंड ब्रिज सर्कल, ऐरोली, रेल्वे ब्रिज खालून ठाणे बेलापूर रोडकडे, ठाणे बेलापूर रोड मार्गे घणसोली डी मार्टकडे, डी मार्टकडून राजिंदर आश्रम चौक, राजिंदर आश्रम चौकातून कोपरखरणे मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन या चौकातुन अरेंजा चौक , अरेंजा चौकातून वाहतुक पोलीस चौकी सिंग्नल पासून माथाडी भवन, माथाडी भवनमधील माथाडी कामगारांचे आराध्यदैवत, मराठा आरक्षणाचे जनक स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन या बाईक रॅलीची सांगता होणार आहे.
सोलापूर येथील मोर्चानंतर नवीमुंबईत या बाईक रॅलीचे मराठा आक्रोश मोर्चाच्या वतीने आयोजन केले जात आहे. मराठा समाज्याला न्याय मिळण्यासाठी शासनाचे लक्ष वेचत असताना सोलापूर व अन्य ठिकाणी मराठा आक्रोश मोर्चाच्या कार्यत्यांवर पोलीस यंत्रणेणे गुन्हे दाखल केले, मात्र इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करणा-या काँग्रेसच्या नाना पटोले अशोक चव्हाण, भाई जगताप यांच्यावर गुन्हे दाखल केले का, याबाबत पोलीस महासंचालकांनी माहिती दयावी असे नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी विशाल कृष्णा घोरपडे ,चंद्रकांत विष्णू शेलार, संभाजी बबनराव जानगुडे, संजय रामचंद्र पाटील, शिवाजी बाजीराव खोपडे, रामचंद्र आनंदराव रांजणे आदी उपस्थित होते.





