Press "Enter" to skip to content

मुख्यमंत्र्यांनी लोकभावना समजूनच घेतल्या नाहीत ! दिबासाहेबांच्या नावासाठी संघर्षाचा लढा कायम राहणार !

  • २४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी !
  • दिबासाहेबांच्या नावासाठी आम्ही केंद्रातही जाणार !
  • आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासन अँक्शन मोडवर
  • असेल तर आम्ही रिअँक्शन मोडवर असणार !
  • सर्वपक्षीय कृती समितीची रोखठोक भूमिका !

पनवेल : रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळे दुसऱ्या फेरीची चर्चाही फिसकटली आहे. त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला त्यांचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी घेतलेली हि भूमिका प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त गावांवर अन्यायकारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या या हेकेगिरी भूमिकेला आमचा प्रखर विरोध असून प्रकल्पग्रस्ताचे लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी घोषित करण्यात आलेले २४ जून रोजीचे सिडको घेराव आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणारच आहे, अशी रोखठोक भूमिका लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने आज (दि.२१ जून) येथे आयोजित करण्यात पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांसमोर मांडली.आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासन अँक्शन मोडवर असेल तर आम्ही रिअँक्शन मोडवर असणार आहोत, असा खणखणीत आवाजही कृती समितीने दिला आहे.

पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले सभागृह (आगरी समाज हॉल) येथे आज सायंकाळी ०४ वाजता पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषेदस कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, कॉ भूषण पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव वझे, पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड, जे. डी. तांडेल, दीपक म्हात्रे, भाजपचे युवा नेते दशरथ भगत, कामगार नेते सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ता रुपेश धुमाळ, दीपक पाटील, राजेश गायकर, सीमा घरत, यांच्यासह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगण्यात आलेली कि, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासंदर्भात रविवारी (दि. २०) मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची चर्चेची दुसरी फेरीही मुख्यमंत्र्यांच्या हट्टामुळे फिसकटली. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून न घेता ते बैठकीतून एकदा उठून गेले. त्यामुळे काहीही झाले तरी ‘दिबां’च्या नावासाठी आम्ही माघार घेणार नाही, असा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीने व्यक्त केला. कृती समितीच्या शिष्टमंडळाचे ऐकून न घेता, चर्चा न करताच मुख्यमंत्री बैठकीतून निघून गेल्याने सर्वपक्षीय कृती समितीने २४ जूनचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत करणारच, असा निर्धार केला आहे. भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्‍यांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी लोकचळवळ उभी राहिली आहे. सर्व स्तरांतून तिला पाठिंबा मिळत आहे. खरंतर ही मागणी सन २००८ पासूनची आहे. असे असतानाही राज्यातील ठाकरे सरकारने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या विमानतळाला देण्यात येईल, असे जाहीर केले असून तसा ठराव राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोमार्फत करून घेतला आहे. त्यास रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांतील ‘दिबा’प्रेमी नागरिकांचा तीव्र विरोध आहे. हा असंतोष १० जून रोजी मानवी साखळी आंदोलनातून स्पष्टपणे दिसून आला. तरीही शिवसेनेचे नेते हे बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव विमानतळाला देण्यात येईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. दरम्यान २४ जूनच्या आंदोलनाच्या धसक्यामुळे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे त्याचबरोबर नोटिसा बजावण्याचे तर दुसरीकडे दिबासाहेबांच्या नावाला विरोध करणारे विविध क्लुप्त्या करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही, असे सांगून दिबासाहेबांच्या नावासाठी कितीही विरोध झाला तरी हे आंदोलन होणारच, असेही लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने यावेळी स्पष्ट केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तयारी संदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना हे आंदोलन किमान ०१ लाख लोकांचा ‘भूतो न भविष्यतो’ असे असणार आहे, पोलीस शासन आंदोलन रोखण्यासाठी अथक प्रयत्न करणार मात्र आमचीही तशी तयारी झाली आहे. दिबांचे नाव विमानतळाला मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे, असेही यावेळी समितीच्यावतीने सांगण्यात आले. आणि २४ जूनच्या घेराव आंदोलनात पुढील आंदोलनाची भूमिका मांडण्यात येईल, असेही यावेळी कृती समितीच्यावतीने जाहीर करण्यात आले.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »