नवी मुंबई, कोकण दर्पण : नवी मुंबई महानगर पालिकेने बेलापूर गावातील दुकानांचे गाळे जमीनदोस्त करून कारवाई केली. त्यामुळे संतप्त झालेले ग्रामस्थ रस्त्यावर उतरले.
बेलापूर गावातील ग्रामस्थ वैभव सोनटक्के यांच्या म्हणण्यानुसार १९९२ रोजी बेलापूर गावातील ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना कडून अनामत रक्कम घेऊन २७ गाळे भाडे तत्वावर व्यवसायासाठी दिले होते. त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली होती. तदनंतर, नवी मुंबई महानगर पालिकेने कुठेलेही हस्तांतरण न घेता भाडे वसुली सुरु केली. गेली कित्येक वर्षे बेलापूर ग्रामस्थ इमानी इतबारींनी ग्रामपंचायती नंतर नवी मुंबई महानगर पालिकेला भाडे भरत आहेत. पण गेली २९ वर्षे ग्रामस्थांचे असलेले हे गाळे क्षणाचाही विलंब न करता ग्रामस्थांना दरडावून पोलीस फौज फाट्यासह नवी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी उध्वस्थ करून टाकले, अशी प्रतिक्रिया सोनटक्के यांनी व्यक्त केली.
गेली कित्येक वर्षे बेलापूर ग्रामस्थ इमानी इतबारींनी ग्रामपंचायती नंतर नवी मुंबई महानगर पालिकेला भाडे भरत असून त्याच्या रीतसर पावत्या नवी मुंबई महानगर पालिके कडून घेत होते. प्रशासनाने त्यांना भूल थापा देऊन मार्केट बांधून देण्याचे स्वप्न दाखवले, आणि वारंवार झालेल्या ग्रामस्थांच्या मिटिंग मध्ये गाळे तोडण्यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेने ग्रामस्थांना पर्यायी जागी स्थलांतरित करून देऊ आणि त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याचे कबुल केले होते, तसेच १०० स्केवर फूट चे गाळे मोबदला म्हणून प्रत्येक भू धारकाला देण्याचे कबुल केले होते, पण क्रूर सरकारी अधिकाऱ्यांनी पुढचा मागचा विचार न करता सगळे गाळे भस्मसात करून टाकले आणि होत्याच नव्हतं करून टाकलं, असा आरोप सोनटक्के यांनी केला आहे.
विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन, प्रशासनाला निवेदन करून ४८ तासाच्या आत प्रशासनाने लिखित स्वरूपात प्रत्येक भू धारकाला त्याचा अधिकार देण्याची विनंती केली आहे, आणि तसे जर घडत नसेल तर ह्याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा पीडित ग्रामस्थांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे.
कोकण दर्पण.





