नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘सकाळ सन्मान २०२१’ हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.
प्रभादेवी, मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात दै. सकाळ या नामांकित वृत्तपत्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन समारंभात हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनास्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, परिवहन मंत्री अनिल परब, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सकाळ समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, सकाळचे मुख्य संपादक राहुल गडपाले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.





